गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

वाहन विमा

             वाहन विमा

( संकलन : सुमित रवी सरवदे, रत्नापुरकर)

वाहन विमा म्हणजे काय ?

वाहन विमा हा कार, ट्रक, मोटारसायकल व इतर वाहनांच्या संरक्षणासाठी काढलेला विमा होय. या विम्याचा प्राथमिक उद्देश हा रहदारीच्या अपघातांपासून होणारे वाहनाचे/वाहनांचे नुकसान व वाहनचालकाला वा अपघातात सापडल्याने इतर व्यक्तीला झालेल्या शारीरिक इजा यांपासून आर्थिक सुरक्षा पुरवणे हा आहे. वाहन विमा हा रहदारीच्या अपघातांमुळे निर्माण होणार्‍या अन्य काही दायित्वांपासूनही आर्थिक सुरक्षा पुरवतो. वाहन विम्याच्या विशिष्ट अटी या प्रत्येक विभागाच्या कायदेशीर तरतुदीनुसार बदलतात. काही प्रकारचे वाहन विमा हे रस्ते अपघातांव्यतिरिक्त कारणांमुळे होणारे वाहनाचे नुकसान व चोरी यांपासूनही आर्थिक सुरक्षा प्रदान करतात.


वाहन विम्याची आवश्यकता

आजच्या जमान्यामध्ये महागड्या गाड्या वापरणार्‍यांची संख्या वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर रस्ते अपघातांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. रस्ते अपघातांमुळे होणारे वाहनाचे नुकसान व अपघातामध्ये समाविष्ट व्यक्तींच्या उपचाराचा खर्च यामुळे खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो. बर्‍याच वाहनधारकांना हा आर्थिक खर्च पेलणे कठीण असते. म्हणूनच वाहनधारकांसाठी ही एक चिंतेची बाब असते. बरेच लोकं या भीतीमुळे स्वतःचे वाहन विकत घेणे टाळतात. वाहनधारकांची ही चिंता मिटवण्याचे काम वाहन विमा करतो.

वाहन विमा हा अपघातामुळे निर्माण होणार्‍या समस्यांमधील आर्थिक बाजू सांभाळतो. त्यामुळे वाहन विमा असलेली व्यक्ती ही विनाचिंता वाहन वापरण्याचा आनंद लुटू शकते. एखाद्या गोष्टीमधील जोखीम ती गोष्ट वापरणाऱ्या सर्वांमध्ये विभागणे हे विम्याचे सर्वसाधारण सूत्र इथेही वापरले जाते.

वाहन विम्याचा इतिहास:

रोड ट्रॅफिक ॲक्ट १९३० नुसार इंग्लंडमध्ये वाहन विमा हा सर्वप्रथम अनिवार्य केला गेला. त्यानंतर जर्मनीने १९३९ साली असा कायदा केला.

वाहन विम्यातील समाविष्ट बाबी:


वाहन विम्यामध्ये खालीलपैकी काही किंवा सर्व बाबींचा समावेश असतो.

  1. वाहन विमाधारक व्यक्ती (वैद्यकीय खर्च)
  2. वाहन विमाधारकामुळे झालेले मालमत्तेचे नुकसान
  3. विमाधारक वाहनाचे नुकसान
  4. थर्ड पार्टी (वाहन व व्यक्ती, मालमत्तेचे नुकसान व शारीरिक इजा) व थर्ड पार्टी, आग व चोरी
  5. विमाधारक वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च (अपघातात कोणाचीही चूक असली तरीही)
  6. दुसरे वाहन भाड्याने घेण्याचा खर्च (जर विमाधारकाच्या वाहनाचे नुकसान झाले असेल तर)
  7. अपघातग्रस्त वाहन अपघाताच्या जागेपासून दुरुस्तीच्या जागेपर्यंत घेऊन जाण्याचा खर्च
  8. अपघातामध्ये समाविष्ट इतर विमा नसलेल्या वाहनचालकांचा वैद्यकीय खर्च

विभिन्न विमा पॉलिसी मध्ये वेगवेगळ्या बाबींचा अंतर्भाव असू शकतो. उदा. चोरी, आगीमुळे होणारे नुकसान, व अपघातांमुळे होणारे नुकसान यांसाठी वेगवेगळा वाहन विमा असू शकतो.


विमा करताना :

खासगी व व्यापारी उपयोगाची वाहने यांच्यासाठी विम्याचे दर वेगवेगळे आहेत. विम्याचा अर्ज भरताना "आरटीओ‘च्या नोंदणी प्रमाणपत्रानुसार मालकाचे नाव, गाडीचा नोंदणी क्रमांक, नोंदणी तारीख, इंजिन व चासीज क्रमांक वगैरे काळजीपूर्वक नमूद करावे लागते. वाहनाची अश्‍वशक्ती किंवा क्‍युबिक कपॅसिटी हीसुद्धा महत्त्वाची माहिती असते. नुकसान भरपाईचा दावा केल्यानंतर क्षुल्लक कारणाने दावा फेटाळला जाण्याची शक्‍यता असते, त्यामुळे याबाबत काळजी घेतली पाहिजे.

वाहनाची किंमत ठरविताना :

खासगी तसेच व्यापारी वाहनांचा विमा उतरविताना त्यातील वाहनाच्या नुकसानभरपाईचा भाग मोठ्या जोखमीचा असतो. यामध्ये गाडीच्या किमतीवर विमा हप्ता आकारला जातो. नोंदणी तारखेपासून पुढील पाच वर्षे एक्‍स शोरूम किमतीवर दर वर्षी विशिष्ट घसारा आकारून किंमत ठरते. त्यानंतर ग्राहक व विमा कंपनी यांच्यात परस्परसमजुतीने किंमत (इन्शुअर्ड्‌'ज डिक्‍लेअर्ड व्हॅल्यू) ठरविली जाते. संपूर्ण विमा करताना वाहनाची किंमत अत्यंत महत्त्वाची असते. वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च वाहनाच्या किमतीच्या विशिष्ट टक्‍क्‍यांच्यावर (उदा. टोटल लॉस) जात असल्यास आधारभूत किमतीवर दावा निकाली निघतो. वाहनाची किंमत निश्‍चित करताना, विमा हप्ता कमी पडावा म्हणून किंमत कमी ठेवल्यास वरील बाबतीत मोठ्या नुकसानीस तोंड द्यावे लागते. गरज वाटल्यास विमा कंपनीच्या व्हॅल्युअरकडून किंमत ठरवून घेता येते. इंजिन किंवा वजनक्षमतेवर विशिष्ट कोष्टकानुसार यात हप्ता आकारला जातो.

खासगी वाहनातील कार टेप, एलसीडी आदी मौल्यवान वस्तूंचा वेगळा आकार भरून विमा करावा लागतो. वाहनात एलपीजी, सीएनजी किट बसविलेले असल्यास त्याची किंमत नमूद करून त्याचाही वेगळा आकार भरावा. अशा प्रकारे वेगळा आकार भरून त्या-त्या वस्तूंचे संरक्षण घेणे आवश्‍यक असते.


अतिरिक्त विमा:

अतिरिक्त विमा म्हणजे प्रत्येक वेळा जेव्हा वाहन दुरुस्त केले जाते तेव्हा ठरावीक रक्कम विमा कंपनीकडून दुरुस्तीच्या खर्चापोटी मिळते. परंतु ही रक्कम विमाधारकाला न देता थेट वाहन दुरुस्त करणार्‍याला बिलापोटी दिली जाते. अर्थात ही रक्कम किती असावी याला कमाल मर्यादा आहे. जर वाहन दुरुस्तीचे बिल या कमाल मर्यादेपेक्षा जास्त आले तर उर्वरित रक्कम वाहनधारकाला भरावी लागते. ही कमाल मर्यादा वाहन विमा धारकाने घेतलेल्या पॉलिसीनुसार बदलते. अधिक कमाल मर्यादा असणाऱ्या पॉलिसीचा हप्तासुद्धा अधिक असतो.

तृतीय पक्ष विमा (थर्ड पार्टी इन्शुरन्स)

बर्‍याच रस्ते अपघातांमध्ये वाहनचालक व ते वाहन याव्यतिरिक्त इतर वाहने, व्यक्ती व संपत्ती यांचे नुकसान होते. सध्या वाहन विम्यामध्ये या इतर बाबींच्या खर्च समाविष्ट नसू शकतो. अश्या वेळेस तृतीय पक्ष विमा (थर्ड पार्टी इन्शुरन्स) कामी येतो. तृतीय पक्ष विम्यामध्ये तुम्ही व तुमचे वाहन यांचा समावेश नसतो. तुमच्यामुळे तृतीय पक्षाचे झालेले नुकसान व त्यामुळे निर्माण होणारी कायदेशीर जबाबदारी यांची काळजी घेण्याचे काम तृतीय पक्ष विमा करतो. या विम्यामुळे तृतीय पक्षाला होणार्‍या आर्थिक भुर्दंडापासून वाचविता येते. बर्‍याच देशांमध्ये वाहनधारकांना वाहन खरेदीवेळी तृतीय पक्ष विमा विकत घेणे बंधनकारक आहे. तृतीय पक्ष विमा हा वाहन विम्यासोबत किंवा वेगळा विकत घेता येऊ शकतो.

थर्ड पार्टी व संपूर्ण विम्यातील फरक:

थर्ड पार्टी विम्यात वाहन सोडून त्याचा चालक, क्‍लीनर, प्रवासी किंवा हमाल यांना; तसेच इतर वाहने व मालमत्ता यांच्या नुकसानीची न्यायालयामार्फत भरपाई मिळू शकते. संपूर्ण विम्यात वरील संरक्षणासह स्वतःच्या वाहनाच्या नुकसानीची भरपाई मिळू शकते. सर्वसाधारण विम्यात वाहनमालकाकडून हवी असलेली भरपाई न्यायालयात दावा करून मिळवावी लागते, तर वाहनाची अपघातामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई वाहनमालकास विमा कंपनीकडून दावा करून घ्यावी लागते.

विम्याचा दावा करताना :

वाहनाचा अपघात झाल्यास विमा कंपनीस त्वरित लेखी कळवावे लागते. अपघातानंतर व्यापारी वाहनाचा स्पॉट सर्व्हे, पोलिस पंचनामा करून घेऊन त्याची प्रत दाव्यासोबत जोडावी लागते. दुरुस्तीसाठी वाहन दिल्यानंतर दुरुस्तीचे अंदाजपत्रक (एस्टिमेट) घेणे आवश्यक असते. दावा फॉर्ममध्ये अपघाताचे नेमके विवरण स्पष्टपणे नमूद करावे लागते. अपघातामुळे नेमके काय नुकसान झाले, हेही नमूद करणे गरजेचे असते. दावा अर्जासोबत दुरुस्ती अंदाजपत्रक, नोंदणीपुस्तक, वाहनपरवाना, कर पावती, फिटनेस दाखला, परमिट याच्या गरजेप्रमाणे झेरॉक्‍स प्रती जोड्तात. सर्व कागदपत्रांसह कोणताही रकाना न सोडलेला दावाअर्ज विमा कंपनीत सादर केल्यावर सर्व्हेअरने मंजुरी दिल्यानंतर वाहनाची दुरुस्ती करता येते. दुरुस्तीचे बिल रक्कम मिळाल्याच्या पावतीसह आणिअन्य कगदपत्रांसह विमा कंपनीकडे सादर केल्यावर तीस दिवसांत दावा निकाली निघतो. किरकोळ रकमेचा दावा केल्यास वाहनाअभावी होणारी गैरसोय होते व पुढील वर्षी कापला जाणारा "नो क्‍लेम बोनस‘ व वाहन किमतीचा घसारा मिळत नाही.

वाहनाच्या विम्याचा दावा का नाकारला जाऊ शकतो?

  • . विम्याचे नूतनीकरण केले्ले नसल्यास
  • विमा कंपनीला न विचारता वाहनाची दुरुस्ती केल्यास
  • वाहनात अन्ध्कृतपणे सीएनजी/एलपीजी किट बसवले असल्यास
  • खासगी वाहन व्यापारी उपयोगासाठी वापरले असल्यास
  • अपघाताच्या वाहनात क्षमतेपेक्षा अधिक व्यक्ती बसलेल्या असल्यास
  • वाहन पाण्यातडकले असल्यावर इंजिन चालू करण्याचा प्रयत्‍न केलेला असल्यास
  • वाहन विकल्यानंतर त्याची व नव्या मालकाची नोंदणी पुस्तकात नोंद केलेली नसल्यास
  • आपल्या वाहनाची अतिरिक्त की गमावली.

संदर्भ यादी दाखवा :

  1. ^ "मोटार विमा महत्त्वाचा". वेगवान.इन. १० सप्टेंबर २०१४.
  2. ^ "वाहन विमा : काळाची गरज". आपलापुणे.कॉम. १७ मार्च २०१६.
  3. ^ "कार विमा (Car Insurance) - टर्टलमिंट". टर्तलमिंट.कॉम. ६ मे २०१६.
  4. ^ "थर्ड पार्टी क्लेम (तृतीय पक्ष विमा) काय ते जाणून घ्या". लोकसत्ता.कॉम. २६ डिसेंबर २०१२.
  5. ^ "वाहन विमा व तृतीय पक्ष दावा". सकाळ.कॉम. २५एप्रिल २०१०.
  6. ^ "Lost your spare car key? Your claim might just get rejected"www.businesstoday.in. 2019-12-17 रोजी पाहिले.

आर्थिक नुकसानभरपाईचा हक्क

आर्थिक नुकसानभरपाईचा हक्क


अनेकदा असे होते की, अपघात झाल्यानंतर जखमींना म्हणा किंवा मृतांच्या नातेवाइकांना म्हणा, मदत देण्याचे जाहीर होते. ती मदत खरोखर दिली जाते की नाही हा संशोधनाचा विषय आहे.

✍️ सुमित रवी सरवदे, रत्नापूर.


आपण वाहन चालवतो, वाहतुकीचे नियमही पाळतो.. मात्र, प्रत्येकवेळी आपल्याला सर्वच नियम माहीत असतील असे नाही. याविषयी कायदा काय म्हणतो याचीही अनेकांना माहिती नसते. मोटार वाहन नियमांची तसेच त्यातील बदलांची ओळख व्हावी, तसेच त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व बाबींची माहिती व्हावी यासाठी ड्राइव्ह स्ट्रेट सदर..

अनेकदा असे होते की, अपघात झाल्यानंतर जखमींना म्हणा किंवा मृतांच्या नातेवाइकांना म्हणा, मदत देण्याचे जाहीर होते. ती मदत खरोखर दिली जाते की नाही हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, रस्ता अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला त्याच्या हक्काची नुकसानभरपाई मिळवण्याचे सर्वाधिकार न्यायसंस्थेने दिले आहेत. अपघात चालकाच्या हलगर्जीपणामुळे किंवा बेदरकारपणे गाडी चालवण्यामुळे झाला असेल तर त्या चालकावर भारतीय दंड संहिता कलम २७९ व मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा नोंदवला जातो. अपघातातील जखमींची अवस्था किरकोळ अथवा गंभीर स्वरूपाची असेल तर चालकावर भारतीय दंड संहिता कलम ३३७ व ३३८ नुसार अतिरिक्त कलमे लागतात. आणि जर अपघातग्रस्त मृत्यूमुखी पडला तर भारतीय दंड संहिता कलम ३०४ अ नुसार गुन्हा नोंदवला जातो. मात्र, हा गुन्हा केवळ हलगर्जीपणा किंवा बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे चालकावर दाखल होऊन त्यानुसार खटला चालवला जातो. इथेच ग्यानबाची मेख आहे. आपल्याला याच खटल्यातून नुकसानभरपाई मिळेल अशी आशा अपघातग्रस्तांना वाटत असते. वस्तुत परिस्थिती वेगळी असून अधिकाधिक नुकसानभरपाई पदरात पाडून घेण्यासाठी वेगळी लढाई लढावी लागते. त्यासाठी स्वतंत्ररित्या अस्तित्त्वात असलेल्या न्यायाधिकरणाकडे अर्ज करावा लागतो. याची बहुतांश लोकांना माहिती नसते. चालकावरील गुन्हा नोंदणी, त्याचे दोषित्व यातून अपघातग्रस्ताला मदत मिळणार असली तरी नुकसानभरपाई मिळण्याच्या रकमेवर त्याचा परिणाम होत असतो. न्यायालयाने मोटार अपघातात मिळणाऱ्या भरपाईचे सामान्य (जनरल डॅमेजेस) आणि विशेष (स्पेशल डॅमेजेस) भरपाई अशा दोन प्रकारांत विभाजन केले आहे. प्रथम प्रकारातील भरपाई मानसिक, शारीरिक आघात, होणारा त्रास, वेदना, होणारी गरसोय, जीवनातील होणारा त्रासदायक बदल इत्यादींसाठी दिली जाते. तर दुस-या प्रकारात मोटार अपघातामुळे पसे कमावण्याची क्षमता गमावणे, संपत्ती व व्यवसायात होणारे नुकसान, इतर खर्च जसे की, वैद्यकीय उपचारासाठी येणारा खर्च, तसेच ठराविक कालावधी साठी घ्यावा लागणारा स्पेशल डाएट, मदतनीस ठेवण्यासाठी लागणारा खर्च व या अनुषंगाने येणारा खर्च यांसाठी नुकसान भरपाई दिली जाते. मोटार वाहन कायदा, १९८८ कलम १४० मध्ये करण्यात आलेल्या तरतुदीनुसार अपघात हा अपघातग्रस्ताच्या चुकीने झाला किंवा कोणत्याही चालकाच्या अथवा वाहन मालकाच्या हलगर्जी शिवाय झाला तरीदेखील अपघातग्रस्ताच्या कायमचे अपंगत्व प्रकरणी २५ हजार व अपघातग्रस्ताच्या मृत्यूप्रकरणी त्याच्यावर अवलंबून असलेले कुटुंबियांना ५० हजार अशी त्वरित मदत दिली जाते. मात्र, त्यासाठी कलम १४० नुसार अर्ज केला जाणे आवश्यक ठरते. एकूणच सर्व प्रकरणाची चौकशी व निकाल लागून अंतिम नुकसान भरपाई मिळण्यास फार उशीर लागतो. म्हणून ही तरतूद करण्यात आली आहे. साधारणत कलम १४० अंतर्गत अर्जाचा निकाल हा ४५ दिवसांत लागला पाहिजे. अनेकदा असेही होते की, अपघात स्थळावरून वाहनधारक पळून जातो किंवा अपघात नेमका कोणत्या वाहनामुळे झाला हे समजत नाही. अशा परिस्थितीत अपघातग्रस्ताला त्वरित मदत मिळते का, त्यात कोणत्या अडचणी येतात, याची माहिती आपण पुढील भागात पाहू या.

सौजन्य:- अ‍ॅड. जयराम सूर्यवंशी

मंगळवार, ७ जानेवारी, २०२०

अजुन काय पाहिजे ?? .

अजून काय पाहिजे.???

_____________________________________

 आम्ही तुला "नाव" मागितले.
तु आम्हाला बदनामी दिली.

आम्ही तुला " स्वातंत्र्य" मागितले.
तु आम्हाला गुलामी दिली.

आम्ही तुला "हिंदू" मागितले.
तु आम्हाला इस्लामी दिली.

आम्ही तुला "पुढारी" मागितले.
तु आम्हाला हरामी दिली.

आम्ही तुला " बरबादी" मागितली.
तु आम्हाला सलामी दिली.

आम्ही तुला "मरण" मागितले.
तु आम्हाला हमी दिली.

_____________________________________
                            © सुमित.
_____________________________________